Anganwadi Sthalantar Zp aschool Mahatvacha Nirnay : राज्यात एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्यांना आता जिल्हा परिषद शाळांतील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. महिला आणि बालविकास विभागाने यासंदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला असून, यासाठी अंगणवाडी आणि शाळा यांच्यामधील अंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त नसावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात सध्या ५५३ बालविकास प्रकल्प आहेत, ज्यात १ लाख १० हजारांहून अधिक अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. अनेक अंगणवाड्या भाड्याच्या जागेत, समाज मंदिरात किंवा अस्थायी ठिकाणी चालवल्या जात असल्याने या निर्णयामुळे स्थैर्य निर्माण होणार आहे.
अंगणवाड्यांना शाळेतील वर्गखोली देताना ती सुरक्षित आणि वापरण्यास योग्य आहे की नाही, याची खातरजमा करण्यात येणार आहे. शाळेतील इतर सुविधा जसे की स्वयंपाकघर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, खेळाचे साहित्य आदींचा वापर अंगणवाडीतील बालकांसाठी करता येणार आहे.
शाळेत वर्गखोली नसेल पण जागा उपलब्ध असेल, तर अंगणवाडीची स्वतंत्र इमारत उभारण्याच्या दिशेने पावले उचलण्यात येतील. तसंच जीर्ण अवस्थेतील किंवा बांधकाम न होणाऱ्या इमारतींमध्ये असलेल्या अंगणवाड्यांनाही शाळांमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे.
या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर समितीची नियुक्ती होणार असून, या समितीने तीन महिन्यांतून एकदा आढावा घेत अहवाल राज्याला सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.