वर्धा : राज्यातील प्रमुख केळी उत्पादक पट्ट्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील सेलू परिसरातील शेतकरी सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. मे २०२६ मध्ये पडलेल्या विक्रमी उष्णतेच्या लाटेमुळे आणि त्यानंतरच्या अवकाळी वादळामुळे हजारो एकरांवरील केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कवी अनिल यांच्या ‘केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी…’ या अजरामर ओळींची पुन्हा एकदा प्रचिती आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Table of Contents
कवी अनिल यांच्या कवितेतील वेदना पुन्हा जिवंत
प्रख्यात कवी अनिल अर्थात आत्माराम रावजी देशपांडे यांनी १९३८ मध्ये वर्धा येथे लिहिलेल्या कवितेतील,
‘केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी,
कोमेजली कवळी पाने, असुनी निगराणी…’
या ओळी आजच्या परिस्थितीशी तंतोतंत जुळताना दिसत आहेत. पुरेसे पाणी आणि काळजी असूनही दूरवरच्या संकटाची झळ केळीच्या बागांपर्यंत पोहोचून त्यांना करपवून गेल्याचा भाव या कवितेत व्यक्त झाला आहे. सध्याच्या उष्णतेच्या तडाख्यामुळे हीच वेदना पुन्हा अनुभवायला मिळत आहे.
सलग ४५ ते ४७ अंश तापमानाचा पिकांवर गंभीर परिणाम
मे महिन्यात वर्धा जिल्ह्यात अनेक दिवस तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. या तीव्र उष्णतेचा थेट परिणाम केळी पिकांवर झाला. अनेक ठिकाणी पानांची करपण, फळांवर डाग पडणे, घडांच्या गुणवत्तेत घट आणि झाडांची वाढ खुंटणे अशा समस्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या.
शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, मल्चिंग, सावली जाळी आणि वाऱ्यापासून संरक्षणासाठी विविध उपाययोजना केल्या. मात्र अभूतपूर्व उष्णतेसमोर हे उपायही अपुरे ठरल्याचे दिसून आले.
वादळानंतर वीजपुरवठा विस्कळीत; संकटात भर
उष्णतेच्या तडाख्यानंतर आलेल्या वादळामुळे अनेक भागांतील वीज यंत्रणा कोलमडली. काही गावांमध्ये चार ते पाच दिवस वीजपुरवठा खंडित राहिला, तर काही ठिकाणी अत्यंत अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिंचन व्यवस्था ठप्प झाली.
केळी हे पूर्णपणे पाण्यावर अवलंबून असलेले पीक असल्याने, कडक उन्हाच्या काळात पाणी न मिळाल्यामुळे नुकसान अधिक वाढले. अनेक बागांमधील झाडे पूर्णपणे करपली असून काही ठिकाणी संपूर्ण बागा सुकण्याच्या मार्गावर आहेत.
लाखोंची गुंतवणूक धोक्यात
केळीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. सध्या एका एकरासाठी सुमारे २.५० ते ३.५० लाख रुपयांपर्यंत खर्च येत आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी बँका आणि पतसंस्थांकडून कर्ज घेतले आहे.
मात्र बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे उत्पादन मिळण्याची आशा मावळली असून, कर्जफेड आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
केळी उत्पादक संघाच्या प्रमुख मागण्या
वर्धा जिल्हा केळी उत्पादक संघाने प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत :
- प्रभावित केळी बागांचे तातडीने विशेष पंचनामे करण्यात यावेत.
- या उष्णतेला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून विशेष नुकसानभरपाई द्यावी.
- पीकविमा योजनेचा लाभ त्वरीत मिळावा.
- कर्जाच्या हप्त्यांना मुदतवाढ देऊन व्याज सवलत देण्यात यावी.
- थकीत शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडू नये तसेच दंड व व्याज माफ करावे.
- उन्हाळ्यात कृषी फीडरवर अतिरिक्त तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा.
- केळी बागांच्या पुनरुज्जीवनासाठी खते, औषधे आणि इतर निविष्ठांवर विशेष अनुदान जाहीर करावे.
शासनाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांच्या आशा
वर्धा जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादक कुटुंबांचे भवितव्य आता शासनाच्या निर्णयावर अवलंबून आहे. तातडीने मदत आणि नुकसानभरपाई जाहीर झाली नाही, तर आर्थिक संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
केळी उत्पादक संघाचे प्रतिनिधी डॉ. सचिन पावडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या वेदनांना न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा कवी अनिल यांच्या ‘केळीचे सुकले बाग…’ या ओळींमधील आर्त स्वर कायमच वास्तव ठरत राहील.
