Vidarbha Musaldhar Paus Alert August : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे ढग ओडिशाकडे सरकत असल्याने पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या २६ ऑगस्टपासून चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. काल बुधवारी नागपुरातही पावसाने हजेरी लावली होती.
हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
Table of Contents
आज कोणत्या जिल्ह्यांना फटका?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २८ ऑगस्ट रोजी विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडेल. तर भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
उद्या (२९ ऑगस्ट) कसे वातावरण?
उद्या शुक्रवारीही अमरावती, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर केला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाचा धुमाकूळ
शनिवारी (३० ऑगस्ट) यवतमाळ आणि वाशिम वगळता उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल असे हवामान विभागाने सांगितले असून, सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
ई-पीक पाहणीमध्ये मोठा बदल! नवीन अॅप, नवीन नियम – शेतकऱ्यांनी चुकवू नका ही माहिती!
पूर्व विदर्भात पूरस्थिती गंभीर
भामरागड पुन्हा एकदा कापला संपर्क
गडचिरोलीतील पर्लकोटावरील जुना पूल पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुका मुख्यालयासह परिसरातील शंभरहून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क पुन्हा तुटला आहे. या पावसाळ्यात भामरागडचा संपर्क तुटण्याची ही चौथी वेळ आहे! नव्या पुलाचे काम न्यायालयीन गुंतागुंतीत अडकले असल्याने दरवर्षी भामरागडवासीयांना यशाचे त्रास सहन करावे लागतात.
चंद्रपूरमध्ये रिकॉर्ड पाऊस
मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, नागभीड, चिमूर या तीन तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. सिंदेवाही तालुक्यात सर्वाधिक १११.८ मिमी पाऊस नोंदवला गेला. चिमूर येथे ७७ मिमी तर नागभीड तालुक्यात ५३.३ मिमी पाऊस झाला.
बस सेवा बंद, ट्रक पाण्यात अडकला
वर्धा जिल्ह्यातील लालनाला प्रकल्पातून पाणी सोडल्याने बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत चिमूर-हिंगणगाट मार्गावरील बस सेवा बंद राहिली. ब्रह्मपुरी तालुक्यातील भुतीनाल्यावरील अर्धवट पुलावर एक ट्रक पाण्यात अडकला होता.
तलावाची पाळ फुटली, मासे वाहून गेले
सिंदेवाही तालुक्यातील ठकाबाई तलावालगत असलेल्या गोसेखुर्दच्या कालव्याची पाळ फुटली. कालव्यातील पाणी तलावात गेल्याने तलावाची पाळही फुटली आणि तलावातील पाणी व मच्छिमार संस्थेच्या मासोळ्या वाहून गेल्या. सिंदेवाही तालुक्यातील टेकरी गावालगतच्या नदीवरील रस्ता दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहिला.
नागरिकांना सल्ला: पुढील काही दिवसांत अनावश्यक प्रवास टाळा आणि हवामान विभागाचे अपडेट्स नियमित तपासत रहा.