भारतीय रेल्वेने आपल्या जुन्या पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम (PRS) मध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, ऑगस्ट 2026 पासून नवी आणि अत्याधुनिक तिकीट बुकिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर सेवा मिळणार आहे.
सध्याची रेल्वे तिकीट बुकिंग प्रणाली 1986 मध्ये सुरू करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांत त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या, मात्र वाढती प्रवासी संख्या आणि ऑनलाइन बुकिंगची वाढती गरज लक्षात घेता आता पूर्ण प्रणाली आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित केली जात आहे.
नवीन प्रणालीमुळे तिकीट बुकिंगचा वेग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या एका मिनिटात सुमारे 32 हजार तिकीट बुक होतात, तर नव्या प्रणालीमध्ये हा आकडा तब्बल 1.5 लाख तिकिटांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे वेबसाइट स्लो होणे किंवा हँग होण्याच्या समस्या कमी होण्याची शक्यता आहे.
मोफत सायकल योजना 2025: बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार 4,500 रुपयांची मदत
तत्काळ (Tatkal) तिकीट बुकिंगदरम्यान अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. नव्या तंत्रज्ञानामुळे तत्काळ बुकिंग अधिक सुरळीत आणि वेगवान होणार असून कमी वेळेत तिकीट मिळवणे सोपे होईल.
याशिवाय, वेटिंग लिस्ट कन्फर्म होण्याचा अंदाज अधिक अचूकपणे मिळणार आहे. एआय (Artificial Intelligence) आधारित फीचर्सच्या मदतीने प्रवाशांना तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता अधिक स्पष्टपणे समजू शकणार आहे.
रेल्वे विभाग “रेलवन” अॅपमध्येही सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. या अॅपद्वारे तिकीट बुकिंग, रद्द करणे, रिफंड, लाईव्ह ट्रेन स्टेटस, प्लॅटफॉर्म माहिती आणि रेल मदत यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षभरात या अॅपला कोट्यवधी डाउनलोड मिळाले असून भविष्यात त्यामध्ये आणखी स्मार्ट फीचर्स जोडले जाणार आहेत.
नवीन तिकीट बुकिंग प्रणालीमुळे भारतीय रेल्वेचा डिजिटल अनुभव अधिक वेगवान, सुरक्षित आणि वापरण्यास सोपा होणार असल्याचे मानले जात आहे.
