Ladaki Bahin Yojana Update : राज्यातील लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. कारण राज्य सरकारकडून या योजनेतील लाभार्थ्यांची काटेकोर पडताळणी सुरू आहे. त्यामुळे अनेक महिलांचे अर्ज रद्द होत असून, आता सरकारने थेट इन्कम टॅक्स विभागाशी सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या कराराच्या माध्यमातून अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्यास मदत होणार आहे. अर्जदारांची माहिती गोपनीय राहील, याचीही खात्री सरकारने दिली आहे.
आत्तापर्यंत बाद झालेल्या अर्जांची माहिती अशी :
- संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी – 2.30 लाख
- 65 वर्षांहून अधिक वयाच्या महिला – 1.10 लाख
- कुटुंबातील चारचाकी वाहनधारक, नमोशक्ती योजनेचे लाभार्थी आणि योजना सोडणाऱ्या महिला – 1.60 लाख
- एकूण अपात्र महिला – 5 लाख
सरकारच्या आर्थिक तणावामुळे आणि वाढीव हफ्ता (₹2100) न देण्याच्या भूमिकेमुळे अनेकांच्या शंका अधिक बळावल्या आहेत. शिंदे गटातील काही मंत्र्यांनीही लाडकी योजनेवर खर्च जास्त होत असल्याचे खुलेपणाने कबूल केले आहे. त्यामुळे लवकरच आणखी अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या तिजोरीवर भार कमी करण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंतच योजना पोहोचावी यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काही महिन्यांत लाडकी लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होऊ शकते.