महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ मतदारसंघांमधून विधान परिषदेवर सदस्य निवडण्यासाठी १८ जून रोजी मतदान होणार असून केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार असली तरी सध्याच्या राजकीय आणि संख्याबळाच्या समीकरणांमुळे महायुतीचे पारडे जड असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागणार आहेत. अंबादास दानवे, सुरेश धस, तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रिक्त झालेल्या जागेसह अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Table of Contents
नागपूर पोटनिवडणूक ठरणार चर्चेचा विषय
१७ पैकी १६ जागांसाठी नियमित निवडणूक होणार असताना नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेवर निवडून आल्यानंतर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता नव्याने निवडणूक होत आहे.
विशेष म्हणजे या जागेचा कार्यकाळ १ जानेवारी २०२८ पर्यंतच असल्याने या जागेवर निवडून येणाऱ्या उमेदवाराला फक्त दीड वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. उर्वरित १६ जागांवर निवडून येणाऱ्या सदस्यांना सहा वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांतील यशामुळे महायुती आघाडीवर
अलीकडेच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीने अनेक ठिकाणी प्रभावी कामगिरी केली होती. त्याचा थेट फायदा विधान परिषदेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील संख्याबळ पाहता अनेक मतदारसंघांमध्ये महायुती मजबूत स्थितीत असल्याचे चित्र आहे.
या निवडणुकीत मतदार कोण असतात?
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीसाठी सर्वसामान्य नागरिक मतदान करत नाहीत. या निवडणुकीत मतदानाचा अधिकार महापालिकांमधील नगरसेवक, नगरपालिका व नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, स्वीकृत सदस्य तसेच कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्यांना असतो.
कोणत्या मतदारसंघांमध्ये होणार निवडणूक?
राज्यातील खालील १७ मतदारसंघांमध्ये विधान परिषद निवडणूक होणार आहे –
१) पुणे
२) अहिल्यानगर
३) ठाणे
४) जळगाव
५) सांगली-सातारा
६) नांदेड
७) यवतमाळ
८) सोलापूर
९) भंडारा-गोंदिया
१०) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
११) नाशिक
१२) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
१३) अमरावती
१४) धाराशिव-लातूर-बीड
१५) परभणी-हिंगोली
१६) छत्रपती संभाजीनगर-जालना
१७) नागपूर (पोटनिवडणूक)
याआधी या जागांवर कोण होते आमदार?
- सोलापूर – प्रशांत परिचारक (भाजप)
- अहिल्यानगर – अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)
- ठाणे – रवींद्र फाटक (शिवसेना)
- जळगाव – चंदूभाई पटेल (भाजप)
- सांगली-सातारा – मोहनराव कदम (काँग्रेस)
- नांदेड – अमर राजूरकर (काँग्रेस)
- यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
- पुणे – अनिल भोसले (राष्ट्रवादी)
- भंडारा-गोंदिया – परिणय फुके (भाजप)
- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
- नाशिक – नरेंद्र दराडे (शिवसेना)
- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – रामदास आंबटकर (भाजप)
- अमरावती – प्रवीण पोटे (भाजप)
- धाराशिव-लातूर-बीड – सुरेश धस (भाजप)
- परभणी-हिंगोली – विप्लव बाजोरिया (शिवसेना)
- छत्रपती संभाजीनगर-जालना – अंबादास दानवे (शिवसेना)
- नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
निवडणूक कार्यक्रम जाहीर
- अधिसूचना जारी : २५ मे
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख : १ जून
- अर्ज छाननी : २ जून
- अर्ज माघारीची अंतिम तारीख : ४ जून
- मतदान : १८ जून (सकाळी ८ ते दुपारी ४)
- मतमोजणी : २२ जून
पुणे मतदारसंघ ठरणार सर्वाधिक चर्चेचा
यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत पुण्याच्या जागेकडे विशेष लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ पाहता येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे तब्बल ३४४ प्रतिनिधी आहेत, तर भाजपकडे ३०६ सदस्य आहेत. महायुतीतील शिवसेनेचे ६८ सदस्य, काँग्रेसचे १९, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे १७ आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे ११ सदस्य आहेत.
या आकडेवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याच्या जागेवर आपला दावा मजबूत केला आहे. मात्र भाजप या जागेबाबत काय भूमिका घेणार आणि महायुतीत जागावाटपाचे गणित कसे बसवले जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; कोण बाजी मारणार?
राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही विधान परिषद निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अनेक ठिकाणी महायुती मजबूत स्थितीत असली तरी काही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी देखील जोरदार लढत देण्याच्या तयारीत आहे.
यामुळे येत्या काही दिवसांत उमेदवारांची घोषणा, राजकीय रणनीती, मित्रपक्षांतील समन्वय आणि बंडखोरी यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
