राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागले असून, शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकीतून मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळत आहेत. पक्ष मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने राज्यभर बैठकींची मालिका सुरू केली असताना, नाशिकमधील पहिल्याच बैठकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. पक्षाचे माजी खासदार हेमंत गोडसे हे या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे.
नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रमुख उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा परिषद आणि विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले होते.
Table of Contents
पक्षबांधणीसाठी मोठी रणनीती
शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी राज्यभरात विभागनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत, स्थानिक पातळीवरील ताकद वाढवण्यावर भर दिला जात आहे. नाशिकमधील बैठकीतही याच मुद्द्यांवर चर्चा झाली. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी कोणती रणनीती आखावी यावर सविस्तर मंथन करण्यात आले.
मात्र या बैठकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते हेमंत गोडसे यांच्या अनुपस्थितीने. विशेष म्हणजे, गोडसे नाशिकमध्ये उपस्थित असूनही बैठकीला न आल्याची माहिती समोर आल्याने पक्षातील अंतर्गत नाराजी उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेमंत गोडसे नाराज?
शिवसेनेच्या नव्या कार्यकारणीत अपेक्षित स्थान न मिळाल्यामुळे हेमंत गोडसे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. राज्यातील पहिल्याच बैठकीत त्यांची अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत या घटनेतून मिळत असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, बैठकीला पक्षातील मोठे नेते आणि मंत्री उपस्थित असताना गोडसे यांनी दांडी मारल्याने शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आगामी काळात याचा पक्ष संघटनेवर काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आदित्य ठाकरे यांचाही नाशिक दौरा ठरला
दरम्यान, ठाकरे गटानेही नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे 24 मे रोजी नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. पक्षाची पुनर्बांधणी, नाराज कार्यकर्त्यांशी संवाद आणि संघटन मजबूत करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
नाशिकमध्ये सध्या दोन्ही शिवसेनांकडून संघटनात्मक हालचाली वेगाने सुरू असून, आगामी राजकीय समीकरणांसाठी हा जिल्हा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेतील अंतर्गत नाराजी पुढे मोठा राजकीय वाद निर्माण करणार का, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
